काँग्रेसचं लक्ष्य २०१९ नाही तर २०२२ विधानसभा निवडणुकीवर- अखिलेश यादव

अखिलेश यादव यांची काँग्रेसवर टीका

Updated: Apr 26, 2019, 07:34 PM IST
काँग्रेसचं लक्ष्य २०१९ नाही तर २०२२ विधानसभा निवडणुकीवर- अखिलेश यादव title=

वाराणसी : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या या विधानामुळे देशात एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी बिग फाट बघायला मिळेल, अशी अपेक्षा देशवासियांना होती. मात्र काँग्रेसनं अजय राय यांनाच पुन्हा एकदा वाराणसीमध्ये संधी दिली आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र प्रियंका नेमक्या का लढत नाहीयेत, याचीही चर्चा सुरू झाली. यावर काँग्रेसच्या थिंक टँकमधले वजनदार नेते सॅम पित्रोदा यांनी खुलासा केला. प्रियंकांना स्वतःच लढायचं नव्हतं, असं ते म्हणाले. 

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 'सपा आणि बसपा एकत्र आले त्या क्षणापासून आमचं एकच लक्ष्य आहे. जातीयवादी पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखणं. त्यासाठी आम्ही दोघांनीही आमच्या काही जागांवर पाणी सोडलंय. पण काँग्रेसचं उद्दिष्ट हे या निवडणुकीत भाजपाला रोखण्याचं नाही. २०२२ साली उत्तर प्रदेशात पक्षाची सत्ता यावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी तोफ डागलीय आहे.

काँग्रेसनं प्रियंका गांधी-वाड्रा यांना दिलेली पूर्वांचलची जबाबदारी ही २०२२ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच दिलीये. त्यामुळे प्रियंकांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी अखिलेश यादव यांची काँग्रेसवर टीका बरंच काही सांगून जाते आहे.