पुढच्या १२ तासांसाठी 'या' राज्यांत भीषण चक्रीवादळ तांडवाचा अलर्ट

मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय

Updated: Apr 27, 2019, 03:27 PM IST
पुढच्या १२ तासांसाठी 'या' राज्यांत भीषण चक्रीवादळ तांडवाचा अलर्ट  title=

चेन्नई : भारतीय हवामान विभागानं (IMD) शनिवारी २७ एप्रिल रोजी हिंद महासागर आणि दक्षिणपूर्व बंगाल खाडीलगतच्या क्षेत्रांना धोक्याचा इशारा दिलाय. या क्षेत्रालगतच्या राज्यांना चक्रीवादळाचा धोक्याबाबत सूचित करण्यात आलंय. येत्या १२ तासांत चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केलीय. मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. 

पूर्व भूमध्यरेषेतील हिंद महासागर आणि त्याच्याशी निगडीत दक्षिणपूर्व बंगाल खाडीमध्ये दिसणारा दबाव उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकतोय... ही स्थिती पुढे जाऊन भीषण रुप धारण करू शकते, असंही हवामान विभागानं म्हटलंय. 

यासाठी, विभागानं तामिळनाडू, पाँडिचेरी समुद्र किनारे, कोमोरिन भाग, मन्नारची खाडी आणि केरळच्या समुद्रालगतच्या भागांना धोक्याचा इशारा दिलाय. 

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढच्या १२ तासांत हे वादळ चक्रीवादळाचं रुप धारणं करु शकतं... आणि त्यानंतर पुढच्या २४ तासांच प्रचंड भीषण चक्रीवादळाला समुद्रालगतच्या राज्यांना तोंड द्यावं लागू शकतं. 

रविवारी, १०० किलोमीटर प्रति तासानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम बंगाल खाडीत समुद्राच्या उंचच उंच लाटा येऊ शकतात.