देशात आणीबाणी सारखी परिस्थिती : यशवंत सिन्हा

आपल्या सध्या देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 13, 2018, 07:37 PM IST
देशात आणीबाणी सारखी परिस्थिती : यशवंत सिन्हा title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शुक्रवारी सरन्यायाधीशांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर, माजी केंद्रीय अर्थमंत्री सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार टीका केली.

देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती

आपल्या सध्या देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

लोकशाही वाचवायला हवी

'ज्या ठिकाणाहून लोकशाहीला धोका निर्माण होतं आहे, त्याविरोधात सर्वांनी उभं रहायला हवं आणि लोकशाही वाचवायला हवी,' असं आवाहन यशवंत सिन्हा यांनी केलं.

चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवा

'जर 4 न्यायमूर्ती जनतेसमोर येत असतील, तर हे प्रकरण केवळ सर्वोच्च न्यायालयापर्यंत मर्यादित नाही. वास्तविक, हा गंभीर विषय आहे. ज्याला कुणाला देशाच्या आणि लोकशाहीच्या भविष्याबद्दल काळजी वाटते, त्यांनी चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला पाहिजे.' असं यशवंत सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांचा संदर्भ देताना सांगितलं.

भीतीपोटी केंद्रातले मंत्रीदेखील गप्प

'आपण बोललो तर आपली खुर्ची जाईल, या भीतीपोटी केंद्रातले मंत्रीदेखील गप्प आहेत, असा आरोप करत यशवंत सिन्हांनी, केंद्रीय मंत्र्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

न्यायालयच तडजोडीवर चालत असेल, तर

यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालयच तडजोडीवर चालत असेल, तर लोकशाही धोक्यात असल्याचं समजलं पाहिजे, त्यामुळे चारीही न्यायमूर्तींनी दिलेले संकेत समजून घेऊन, न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे' .

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद

न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कामकाजावर प्रश्न चिन्हं लावलंय.

पत्रकार परिषदेत का म्हणाले न्यायमूर्ती ?

'न्यायव्यवस्थेत २ महिन्यांपासून जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही,'