ज्ञानवापी वादावरुन शरद पवार यांचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा

Sharad Pawar ON Gyanvapi :वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Updated: May 25, 2022, 09:05 AM IST
 ज्ञानवापी वादावरुन शरद पवार यांचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा   title=
Image Source : @PawarSpeaks

मुंबई : Sharad Pawar ON Gyanvapi :वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. त्याचवेळी पवार यांनी ज्ञानवापी वादावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. दरम्यान, केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वक्तव्य केले आहे. ज्ञानवापी वादावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधताना म्हटले की, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी मशिदीचे वाद निर्माण केले जात आहे. देशातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार यांनी केरळमधील मेळाव्यात केली. तसेच फेसबुक पोस्टमधूनही केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.

देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारची भूमिका घेत आहे, ती कदापिही योग्य नाही, असे सांगत  पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. मागील 300 - 400 वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला गेला नाही. अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले जात आहे, असा टोला पवार यांनी लगावला.