हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळले, लोकसभेत मुद्दा उपस्थित

 हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या  घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

Updated: Feb 4, 2020, 05:24 PM IST
हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळले, लोकसभेत मुद्दा उपस्थित title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वर्धामधील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

वर्धा या जिल्ह्यात महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आहे. अशा जिल्ह्यात महिलांवर अशी वेळ येत असेल तर खूप दु:खदायक आहे. अशा घटना रोखल्या पाहिजेत. अन्यथा महिला, मुली घराच्याबाहेर पडणार नाही. आपल्या सरकारचा नारा आहे. 'बेटी बचाव, बेटी पढाव', आज मला अभिमान मुली वाचविल्या जात आहे. मात्र, मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यावर असे हल्ले आणि घटना होणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. यावर कडक कारवाई करण्याची आणि कडक कायदा आणण्याची गरज आहे. अन्यथा आमच्यासारख्या महिलाही यातून सुटणार नाही, अशी गंभीर बाब खासदार राणा यांनी लोकसभा सभागृहात उपस्थित केली.

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातुन शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय.  

दरम्यान, जालनातल्या प्रेमी जोडप्याला मारहाण आणि अत्याचार प्रकरणातल्या चार आरोपींना एक दिवसाची वाढीव पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याआधी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, काही चौकशी बाकी असल्याकारणाने आज पोलीस कस्टडीच्या तिसऱ्या दिवशी दिवाणी न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवल्याचा निर्णय दिला.