अंतराळ क्षेत्रातली महासत्ता! दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश

भारतानं चांद्रयान 3 मोहीम आज यशस्वी करून दाखवली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलाय. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. 

Updated: Aug 23, 2023, 09:04 PM IST
अंतराळ क्षेत्रातली महासत्ता! दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत जगातला पहिला देश  title=

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. भारतानं नवा इतिहास घडवला. 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय.

खरंतर पृथ्वीवर दिसते ती चंद्राची एकच बाजू. जी बाजू दिसत नाही तिला दक्षिण ध्रुव किंवा चंद्राची डार्क साईड म्हटलं जातं. या डार्क साईडच्या बाजूला उतरून तिथली रहस्य जाणून घेण्याचा चांद्रयान 3 मोहिमेचा उद्देश आहे. रशिया स्पेस एजन्सीच्या लुना 25 नं गेल्या रविवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) उतरण्याचा प्रयत्न केला.  भारतीय चांद्रयान 3 सोबत स्पर्धा करत आधी तिथं पोहोचण्याचा खटाटोप केला. मात्र दुर्दैवानं रशियाचं यान चंद्रावर क्रॅश झालं. रशियाचं स्वप्न भंगलं. भारतानं मात्र चांद्रयान 3 यशस्वीपणं दक्षिण ध्रुवावर उतरवून तिथं तिरंगा फडकावला.

भारताची चांद्रयान 3 मोहीम फत्ते झाल्यानं आता त्याचा फायदा नासासह जगभरातील विविध अंतराळ संशोधन संस्थांना होणाराय. 

चंद्रावर सापडणार पाणी?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे. चंद्रावर जीवन आहे की नाही, हे शोधण्यासाठी चांद्रयान 3 महत्त्वाचं ठरणाराय. त्याशिवाय विविध प्रकारचं खनिजं देखील चंद्रावर असण्याची शक्यता आहे. चंद्रावर मानवी वस्ती शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणाराय. गेल्या सात दशकात चंद्रावर जाण्यासाठी तब्बल 111 मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यापैकी 62 मोहिमा यशस्वी झाल्या, तर 41 मोहिमा अपयशी ठऱल्या.

चांद के पार चलो... 
17 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेनं 'पायोनिअर 0' ही पहिली चांद्र मोहीम राबवली, ती यशस्वी ठरली
1958 मध्ये रशिया आणि अमेरिकेनं 6 चांद्र मोहिमा राबवल्या, त्या सगळ्याच असफल ठरल्या
2 जानेवारी 1959 रोजी लुना 1 या रशियाच्या चांद्र मोहिमेला अंशतः यश मिळालं
जुलै 1969 मध्ये अपोलो 11 मिशननं ऐतिहासिक यश मिळवलं
या मोहिमेच्या माध्यमातून मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं

आता चांद्रयान 3 मिशन फत्ते करून भारतानं नवा देदिप्यमान, अभूतपूर्व इतिहास घडवलाय. भारताला अंतराळ क्षेत्रातली सुपरपॉवर बनण्याच्या दृष्टीनं ही मोहीम मैलाचा दगड ठरलीय...