पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्याचा भारताचा निर्णय

पाकिस्तानला भारताचा मोठा दणका

Updated: Feb 15, 2019, 11:16 AM IST
पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्याचा भारताचा निर्णय title=

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध अनेक निर्णय घेण्यात आला आहे. डब्ल्यूटीओ बनल्यानंतर भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये एमएफएनचा दर्जा दिला होता. पाकिस्तानकडून मात्र भारताला असा कोणताच दर्जा दिला गेला नव्हता.

याआधी उरी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानकडून हा दर्जा काढून घेण्याची मागणी होत होती. पण भारताने तेव्हा हा निर्णय घेतला नव्हता. पाकिस्तानने तेव्हा म्हटलं होतं की, जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होत नाही तोपर्यंत पाकिस्तान हा भारताला एमएफएनचा दर्जा देणार नाही.

काय आहे एमएफएन

मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे सर्वात महत्त्वाचा देश. आंतरराष्ट्रीय व्‍यापार संघटना आणि आंतररष्ट्रीय ट्रेड नियमांच्या आधारावर व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा देशाचा दर्जा दिला जातो. एमएफएनचा दर्जा दिल्यानंतर देशाला याबाबतीत विश्वास असतो की त्यांना व्यापारात कोणतंच नुकसान होणार नाही.

एमएफएन दर्जा मिळण्याचे फायदे

एमएफएनचा दर्जा मिळाल्यानंतर आयात-निर्यातमध्ये विशेष सूट मिळते. अशा देशाकडून सर्वात कमी आयात शुल्क आकारलं जातं. डब्ल्यूटीओच्या सदस्य़ देशांना हा दर्जा दिला जातो. सिमेट, साखर, ऑर्गेनिक केमिकल, कापूस, भाजी आणि काही फळे तसेच मिनरल ऑईल, ड्राई फ्रूट्स, स्टील अशा वस्तूंवर सूट मिळते. भारत आणि पाकिस्तानमध्ये २०१२ पर्यंतच्या आकड्यानुसार २.६० मिलियन डॉलरचा व्यापार झाला होता.

भारताला याचं नुकसान होणार का?

भारताने पाकिस्तानकडून हा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान भारतासोबतचा व्यापार बंद करु शकतो. पण दहशतवाद आणि सुरक्षेच्या मुद्दयावर भारत हे नुकसान सहन करु शकतो. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.