'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'

Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: "अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 3, 2024, 07:43 AM IST
'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..' title=
ठाकरे गटाचा एक्झिट पोलवरुन हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On Exit Poll Results: मतदानोत्तर सर्वेक्षणामधून तयार करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं बहुतांशी संस्थांनी सांगितलं आहे. सरासरी एनडीए आघाडीला 350 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असतानाच उद्धव ठाकरे गटाने हे एक्झिट पोलची आकडेवारी अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिलेत का? अशी शंका ठाकरे गटाने उपस्थित केली आहे.

असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले?

"सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळ्या राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत व भाजपला आणि त्यांच्या आघाडीस 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. भाजपला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे?" असा सवाल 'सामना'मधून करण्यात आला आहे.

हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ

"2014 आणि 2019 पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत व मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे. 1 तारखेस पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. प. बंगालातील 10 जागांसाठी साधारण 59.15 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोग चार-पाच दिवसांनी या आकडय़ात आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी पश्चिम बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले? हरयाणात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल असा निकाल दिला आहे. बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल असे ठोकून दिले आहे," असं विश्लेषण ठाकरे गटाने केलं आहे.

भाजपला साधारण 800 ते 900 जागा मिळायला काहीच हरकत नव्हती

"झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा ‘चमत्कार’ एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या ‘पोल’ कंपन्यांनी स्वतःचीच बेअब्रू करून घेतली," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. "काँग्रेसने तामीळनाडूत फक्त 9 जागांवर निवडणुका लढवल्या, पण एक्झिट पोलने तामीळनाडूत काँग्रेसला 13-15 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. हे सर्व आकडे पाहिले तर एक्झिट पोलवाल्यांनी भाजपला 350 या जागा कमीच दिल्या. लोकसभा 543 जागांची असली तरी भाजपला साधारण 800 ते 900 जागा मिळायला काहीच हरकत नव्हती," अशी उपहासात्मक टीका ठाकरे गटाने केली आहे.

नक्की >> 2019 चे Exit Poll किती अचूक होते? सर्वेक्षणाची आकडेवारी अन् निकालात नेमका किती फरक?

जमीन अस्मानाचा फरक राहील

"दिल्लीत काँग्रेस व आप यांच्यातील युती फलदायी ठरत आहे, पण दिल्लीतील सर्वच्या सर्व 7 जागा भाजपला मिळतील असे अंदाजी निकाल एक्झिट पोलवाल्यांनी जाहीर करून टाकले. सत्य असे आहे की, भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांत प्रत्येक निवडणूक ही बनवाबनवी करून जिंकली. त्यात या एक्झिट पोलचाही वाटा आहे. या वेळी एक्झिट पोलचे आकडे व 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल यात जमीन अस्मानाचा फरक राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. एक्झिट पोलच्या माध्यमातून शेअर बाजारात उलथापालथ घडवायची व जाता जाता मोठा हात मारून जायचे. एक्झिट पोलला शास्त्रीय आधार नाही व भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे गेल्यापासून हवे ते आकडे आणि निकाल सरळ विकत घेतले जातात. हे त्यांचे धोरण ठरलेलेच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मतदान यंत्रणेवर टाकायचा हा खेळ

"विधानसभा निवडणुकांत मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये काँगेस नक्की विजयी होईल असे आकडे एक्झिट पोलने समोर आणले. प्रत्यक्षात या दोन्ही राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. राजस्थानात काँगेस पुन्हा सत्तेवर येईल असाच या आकडेबाजांचा अंदाज होता. तसे घडले नाही. मागच्या विधानसभेत अमित शहा यांनी पश्चिम बंगालवर दिग्विजय मिळवला असल्याचे आकडे आधीच जाहीर झाले, पण पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांना बंपर विजय मिळाला. थोडक्यात, तुमच्या त्या एक्झिट पोलची ही अवस्था आहे. लोकांत भ्रम निर्माण करायचा व त्याचा प्रभाव मतदान यंत्रणेवर टाकायचा हा खेळ आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'तुम्ही सिद्धू मुसेवालाचं...', BJP 350 पार Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदींचाही उल्लेख

अमित शाहांनी फोन करुन दम दिला

"अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली. मतगणनेत भाजपला मदत करा, विरोधकांनी आक्षेप घेतले तर लक्ष देऊ नका असे म्हणे अमित शहांनी अनेक जिल्हाधिकाऱ्यांना धमकावले. हे सत्य असेल तर निवडणूक आयोग हासुद्धा एक कठपुतली बनून फक्त तमाशाच पाहत आहे असेच म्हणावे लागेल," असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे.

भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही

"मोदी ध्यानाला बसले तसा आपला निवडणूक आयोगही डोळे मिटून बगळ्याप्रमाणे ध्यानाला बसला आहे. अर्थात, लोकशाहीत जनता सर्वोपरी व मतदार हाच राजा आहे. 4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे. भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.