एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीला संपवले; कल्याणच्या घटनेची महिला आयोगानं घेतली गंभीर दखल

कल्याणच्या तिसगाव परिसरात 12 वर्षीय मुलीची 25 वर्षाच्या तरुणाने हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून या मुलीला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. 

Updated: Aug 17, 2023, 11:21 PM IST
एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीला संपवले; कल्याणच्या घटनेची महिला आयोगानं घेतली गंभीर दखल  title=

kalyan crime news : कल्याणच्या अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतली आहे. कल्याण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाईची माहिती घेतली. कल्याणच्या तिसगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेला हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचं उघड झाले. आरोपी आठवडाभर तीच्यावर पाळत ठेऊन होता अशी माहिती पोलिसांनी दिली. 16 ऑगस्टला संध्याकाळी मुलगी आईसोबत घरी जात असताना आरोपीनं तिच्यावर चाकूने सात ते आठ वार केले. त्यानंतर स्वत: फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सुरक्षेत वाढ करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना

कल्याणच्या तिसगाव परिसरात 12 वर्षीय प्रणिती दास या अल्पवयीन मुलीची आदित्य कांबळे या तरुणांना चाकूने भोसकून तिच्या सोसायटीच्या आवारात हत्या केली होती.  या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गंभीर दाखल घेण्यात आली. त्याच अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या सदस्य अडव्हॉकेट गौरी छाब्रिया यांनी गुरुवारी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान यावेळी आरोपीच्या कुटूंबाची माहिती गोळा करून आरोपीची मानसिकता काय होती याची चौकशी करावी, कोचिंग क्लासेस आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, त्याचबरोबर कोचिंग क्लासेसनी रात्री उशिरापर्यंत मुलींच्या क्लासेस घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना छाब्रिया यांनी केल्यात .तसेच कोळशेवाडी पोलीस ठाण्याचा या प्रकरणाचा तपास प्राथमिक स्तरावर असून आरोपी संदर्भात आणखी चौकशी करून माहिती समोर येईल असे देखील छाब्रिया म्हणाल्या.

कल्याणच्या घटनेनंतर महिला वर्ग दहशतीत

प्रणिता दास हे १२ वर्षीय मुलगी आपल्या आई सोबत १६ ऑगस्ट च्या सायंकाळी घरी निघाली होती. त्यावेळी तिच्या हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून आदित्यने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिलीय. धक्कादायक म्हणजे आरोपी आदित्य गेल्या अनेक दिवसांपासून प्राणिताचा पाठलाग करत होता. शिवाय हत्या करण्याच्या दिवशी तो सोसायटीमध्ये येऊन प्रणिता राहत असलेल्या ठिकाणी जिन्यामध्ये दबा धरून बसला होता. प्रणिता आणि तिची आई बाहेर घरात जाण्यासाठी जिन्यांमध्ये येताच त्याने तिच्या आईला धक्का देत प्रणितावर चाकूने हल्ला करत तिला भोसकले.हल्ल्यानंतर प्रणिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. कल्याण परिसरात वारंवार गुन्हेगारी घटना घडत असताना आमच्या मुली सुरक्षित नसल्याची भावना इथल्या महिला वर्गांच्या निर्माण झाल्या.शिवाय या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे.