धक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू

घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.  

Updated: Jan 23, 2019, 08:23 PM IST
धक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू title=

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. या रुग्णालयाची लिफ्ट बंदच आहे. त्यामुळे गरोदर महिलेला जिन्याने नेण्यात येत होते. त्यावेळी तिला प्रसूती कळा लागल्या आणि ती बाळंत झाली. या धावपळीत बाळ खाली पडले आणि ते दगावले. याला घाटी रुग्णालयाचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लिफ्ट वेळीच सुरु केली असती किंवा या महिलेला स्ट्रेचर मिळाले असते, तर अशी दुर्दैवी वेळ तिच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयाच्या सततच्या गैरसोईमुळे एका निरागसाला बाळाचा जन्माला येताच जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोमवारी रात्री १ वाजता प्रसूतीसाठी एक महिला घाटी रुग्णालयात आली. तिला कळा सुरु झाल्या होत्या. लिफ्ट बंद असल्याने महिला जिना चढत वर जात असताना तिने जिन्यातच बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळ फरशीवर पडून मृत झाल्याचा आरोप होत आहे. घाटी रुग्णालयातील लिफ्ट गेली कित्येक दिवस बंद आहे, लिप्ट सुरु असती तर कदाचित महिला वेळेत प्रसूतीगृहात पोहोचली सुद्धा असती. मात्र गेली 10 महिने लिफ्ट बंदच आहे. दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला पैसै देवूनही लिफ्ट मात्र सुरु झाली नाही...त्यात आपत्कालीन आलेल्या रुग्णांसाठी स्ट्रेचर सुद्धा उपलब्ध नसते आणि त्यामुळे या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र सगळे आरोप फेटाळत आहे.

रुग्ण आणि नातेवाईक आत आल्यावर स्ट्रेचर दिसलेच नसल्याचे सांगितले. तर लिफ्ट बंद असल्याने गडबडीत पायऱ्यांकडे वळलो आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी आरडाओरड केल्यावर मदत मिळाली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बाळ गेल्याने पीडित कुटुंब हताश आहे. हे गरिब कुटुंब होते. हातचे सगळे गेल्यानंतर त्यांनी कोणाविरुद्ध तक्रार केलेली नाही. 

घाटी रुग्णालयाची अवस्था वाईट आहे, त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास नेहमीचाच. या आधीही अशा अनेक घटना घड़ल्या आहेत. व्हेंटीलेटर असून निकामी, स्ट्रेचर असो वा स्टाफ त्याची कमतरता आहे. औषधांचा वानवा कायमचा असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार कसे होणार, हाही एक प्रश्नच आहे. आरोग्य विभागाने आणि राज्य सरकारने रुग्णालयाच्या या कारभाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तरच येथे येणाऱ्या गरिबाला न्याय मिळेल, अन्यथा अन्याच पदरी पडणार?