10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 14, 2024, 10:21 AM IST
10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश title=
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या एका भीषण अपंघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. (येथे क्लिक करुन पाहा घटनास्थळावरील अंगावर काटा आणणारे PHOTOS)

मद्यपान करुन कार चालवताना दिली धडक

छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. दारू पिऊन भरधाव वेगात स्कॉर्पिओ चालवणाऱ्या दोन तरुणांनी दुभाजक ओलांडून पलीकडे जाणाऱ्या क्विड कारला जोरदार धडक दिली. याच क्विड कारमधून अमरावती येथील अभियंते अजय देसरकर आपल्या कुटुंबासहीत पुण्याला जात होते त्यावेळेस हा अपघात घडला. 

गाडीचा चेंदामेंदा

दुभाजक ओलांडून समोरुन आलेल्या स्कॉर्पिओने या क्विड कारला दिलेली धडक एवढी जोरदार होती की या छोट्या कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता कारची अवस्था पाहूनच समजते. या कारच्या आजूबाजूला अपघातानंतरही काही तास बघ्यांची गर्दी हटत नव्हती. क्विडच्या तुलनेत स्कॉर्पिओला कमी नुकसान झालं असून गाडीची बांधणी दणकट असल्याने कारमधील तरुणांना केवळ दुखापत झाल्याचे समजते.

मृतांची नावं

मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता पोपळघोटे (65), दुर्गा सागर गिते (7) आणि सहा महिन्यांच्या बाळाचा मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात 40 वर्षीय अजय अंबादास बेसरफर आणि 35 वर्षीय शुभांगीनी सागर गिले जखमी झाल्या आहेत. या प्रकरणामध्ये मद्यपान करुन कार चालवणाऱ्या स्कॉर्पिओमधील दोन्ही तरुणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये विचित्र अपघातात दोघे ठार

शुक्रवारी पहाटे नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अचानकच एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यामुळं कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडाली आणि एका बाजूला फेकली गेली. काही क्षणात कारचा चक्काचुर झाला. अपघात इतका गंभीर ठरला की, कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे अशी मृतांची नावं सांगण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही सावरगाव तालुका येवला येथील रहिवासी आहेत. तर, शुभम गंगाधर पानमळे असं जखमी चालकाचं नाव आहे. हा देखील सावरगाव येथील रहिवासी आहे.