Sambhaji Nagar Crime : मैत्रीत पैशानं केला घात! मुलाच्या वादात बापाचा बळी; तरुणाने केली मित्राच्या वडिलांची हत्या

Sambhaji Nagar Crime : मित्रानेच वडिलांची हत्या केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्यनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे

Updated: May 13, 2023, 10:40 AM IST
Sambhaji Nagar Crime : मैत्रीत पैशानं केला घात! मुलाच्या वादात बापाचा बळी; तरुणाने केली मित्राच्या वडिलांची हत्या title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - Reuters)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. अशातच एका तरुणाने मित्राच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. या घटनेनंतर संभाजी नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी (Sambhaji Nagar Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. 

पैशांच्या वादातून 25 वर्षीय एका तरुणाने शुक्रवारी रात्री मित्राच्या वडिलांची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली आहे. कैलास वाकेकर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. तर अजय चव्हाण असे मारेकऱ्याचे नाव आहे. मुलासोबतच्या पैशाच्या वादातून मित्राने वडिलांची हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपासून अजय चव्हाण आणि कैलास वाकेकर यांच्या मुलामध्ये पैशावरून वाद सुरू होता. अजयला शुक्रवारी रस्त्यामध्ये कैलास वाकेकर दिसले. त्याचवेळी अजय चव्हाणने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यानंतर काही कळाच्या आत अजयने जवळच असलेल्या मांस विक्रेत्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि कैलास वाकेकर यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात कैलास वाकेकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरीकडे शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील एका विहीरीत एका तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. मृतदेह कुजलेला अवस्थेत असल्यामुळे शिर पाण्यात गळून पडले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी असे मृत तरुणाने नाव असल्याचे समोर आले आहे. 1 मे पासून हा तरुण बेपत्ता होता. तब्बल 11 दिवसांनी त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अविनाशने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र 1 मे रोजी तो घरातून निघून गेला होता. तेव्हापासून त्याचे कुटुंबिय त्याचा सगळीकडे शोध घेत होते. गेल्या 10 - 12 अविनाश गायब होता. मात्र शुक्रवारी बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे यांच्या शेतातील विहिरीत अविनाशचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी अविनाशच्या कुटुंबातील सदस्यांना ओळख पटवण्यासाठी बोलावले होते. त्याच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्यावर अत्यसंस्कार केले.