चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू

चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.  

Updated: Jul 22, 2021, 02:32 PM IST
चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू title=

रत्नागिरी : राज्यात तुफान पाऊस (Rain) कोसळत आहे. चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्याने चिपळूण शहराला पुराने वेढा घातल्या आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तळमजला बुडाला असून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. तर काहींनी टेरेसवर रात्र काढली आहे. दरम्यान, 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती वक्त होत आहे. परशुराम घाटात दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड आणि कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर झाली आहे. दोन एनडीआरएफच्या टीम चिपळूणला रवाना झाल्या आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्य़ाचे आदेश देण्यात आले आहेत.

 5000 लोक पुरात अडकले - राऊत

चिपळूणमध्ये 5000 लोक अडकल्याची माहिती खासादर विनायक राऊत यांनी दिली आहे. अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मदतकार्यात कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाठवणार, असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

पावसाचे थैमान, महाराष्ट्रात पाहा कुठे काय आहे स्थिती?

Maharashtra Rain Photos : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा पूरस्थिती

रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरमधली पूरस्थिती गंभीर आहे. रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. गेल्या 24 तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूणमध्ये 2005 ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?

कोकणात पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. चिपळूण गुहागर बायपासवर मातीचा ढिगारा कोसळल्याची दृश्य दिसून येत आहेत. कोकणात पावसाचा हाहा:कार सुरू आहे. चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषण परिस्थिती उद्भवली आहे. वाशिष्ठी,शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूण शहराला पावसाचा फटका बसलाय. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण चिपळूण शहर जलमय झालंय. 2005 पेक्षा मोठा पूर या भागात आला आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला 'फटका बसला आहे.  शहरातील अनेक भागात पाणी भरले असून बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट या सर्वच ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे.  तसंच चिपळूण येथे वशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे चिपळूण येथील बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. तर चिपळूण खेर्डी परिसराला देखील या पुराचा फटका बसला आहे. खेर्डी बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय  आहे.