राज्यात गारपीटीचा फटका कुठे आणि किती?

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ११ जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची महिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी माहिती दिली. राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 08:57 PM IST
राज्यात गारपीटीचा फटका कुठे आणि किती?  title=

मुंबई : अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ११ जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची महिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी माहिती दिली. राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय. 

सर्वाधिक फटका कुठे?

फुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक फटका बुलढाणा, अमरावती व जालना जिल्ह्याला बसला आहे. गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते.

कुठे किती झालं नुकसान?

- बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश

- बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील 42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश

- जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

- परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत.

- जालना व परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले

- जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहु, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले.

- अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहु, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

- अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

- वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधील 8 हजार 509 हेक्टर क्षैत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील 59 गावातील 2 हजार 679 क्षेत्रावरील ज्वारी, गहु, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे.

 - उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औढा या दोन तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.

- अशा पद्धतीने एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे