'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'

कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.

Updated: Jul 22, 2020, 07:17 AM IST
'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'  title=
संग्रहित छाया

मुंबई /नाशिक : जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिक शहरातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'मिशन नाशिक झिरो' या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री  भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नंदू साखला, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, प्रशांत पाटील, किशोर सूर्यवंशी, गिरीश पालवे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.

नाशिकमध्ये कोरोनाला अटकाव ‘मिशन झिरो’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही यावेळी मंत्री भुजबळ यांनी काढले. हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. कोरोना कोणाची जात बघत नाही आपण मनुष्य आहोत याचा विचार करून जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करून देण्यात आले आहेत त्यांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात कोरोना हाच आपल्या सर्वांचा प्रतिपक्ष असून आपल्या सर्वांना कोरोनविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे, असे ते म्हणाले.

कोरोनाला घाबरून त्याचा सामना जग करू शकत नाही. या आजारामुळे माणूस माणसापासून दुरावतोय त्यामुळे ही लढाई एक प्रकारची माणूसकी विरूद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने  त्याचा सामना करावयाचा आहे. समाज माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होवू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक कोरोनाचे नेक्स्ट डेस्टिनेशन होत असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी अहोरात्र काम करत आहेत यांच्या श्रमाला आपला सलाम असून हेच सर्व आपल्यासाठी आता देव आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.