कोल्हापुरात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चार राज्यमार्ग आणि १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे 

Updated: Sep 7, 2019, 01:08 PM IST
कोल्हापुरात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चार राज्यमार्ग आणि १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम हा दळवणावर झाला आहे. अनेक गावांचा यामुळे कोल्हापूरशी असलेला संपर्क तुटला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळी पुन्हा वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १९ प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

कालही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पुराचे संकट कायम होते. गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी ४० बंधाऱ्यावर नदीचे पाणी येवून ६० हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याचे चार राज्य महामार्ग आणि १५ जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरवर पुराचे संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे खबरदारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफची तीन पथके दाखल झाली आहेत. कोल्हापूरसाठी एक, शिरोळसाठी एक आणि टाकळीवाडी इथे एक एनडीआरएकचे पथक दाखल झाले आहे. करवीर, शिरोळ आणि  हातकणंगले तालुक्यातील नदीकाठच्या  ग्रामस्थांनी सतर्क रहावे, अस आवाहन जिल्हा प्रशासनान केले आहे.