राज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता

सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.  

Updated: Apr 25, 2019, 11:56 PM IST
राज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता title=
Pic Courtesy : DNA

पुणे / नागपूर : सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याच हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघातापासून बचावासाठी  काळजी घेण्याच आवाहनही पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुराग कश्यप केले आहे. 

पुण्याचा पारा वाढला आणि वाढणार

उष्णतेच्या लाटे मुळे पुणेकर सुध्दा घामाघूम झाले आहेत. पुण्याचा पारा बुधवारी ४१.१ डिग्री सेल्सियस वर जाऊन पोहोचला. जे यावर्षीचं  उच्चांकी तापमान होते. २४ एप्रिलला नोंदविण्यात आलेले तापमान गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे. या आधी १० एप्रिल २०१० मध्ये तापमान ४१.५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले होते 
तर एप्रिल २००९ मध्ये आता ४१.७ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले होते. जे गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. मात्र जर उष्णतेची लाट तीव्र झाली तर हे रेकॉर्ड मोडीत निघत पुण्याचा पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता  आहे. 

दरम्यान या वाढलेल्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकरांची पावले आपोआप ज्युस सेंटर आणि रसवंती गृहांकडे वळताना दिसत आहेत. एवढेच नाही तर दुपारी बाहेर पडण्याचही पुणेकर टाळत आहेत.  

विदर्भातील तापमानात मोठी वाढ 

नागपूरसह पूर्ण विदर्भातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्यानुसार येत्या चार दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरात आता कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. एप्रिल महिन्यात दोनदा तापमान ४४ अंशावर गेले होते. परंतु त्यानंतर पाउस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली होती. त्यामुळे काही काळ नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता.

मात्र आता एप्रिल महिन्याचे शेवटचे काही तापदायक ठरणार आहेत. वातावरणातील आर्द्रता खाली येऊन उन्हाची तीव्रता वाढून तापमानात वाढ होण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान सध्या सरासरी पेक्षा ३ अंशांनी वाढले आहे. शुक्रवार २६ एप्रिलपासून नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' ची परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

विदर्भात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. ब्रम्हपुरी मध्ये तापमान ४५ अंश गेले आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट सारखी परिस्थिती आहे. पुढे आणखी वाढणार. पुढील २४ तास काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार. अनेक ठिकाणी ४२ ते ४४ अंश तापमान आहे, पुढील ४ दिवसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सरासरी पेक्षा तम्पण ४ ते ५ डिग्री पेक्षा जास्त राहिले तर ऑरेंज अलर्ट जरी करण्यात येतो. 

प्रमुख शहरांचे तापमान 

- अकोला  -  ४५.१  अंश सेल्सियस 
- अमरावती - ४४.० अंश सेल्सियस 
- चंद्रपूर  - ४४.२ अंश सेल्सिय 
- गडचिरोली - ४२.० अंश सेल्सियस 
- गोंदिया  - ४२.०  अंश सेल्सियस 
- नागपूर - ४३.४ अंश सेल्सियस 
- वर्धा  - ४२.० अंश सेल्सियस 
- यवतमाळ - ४३.० अंश सेल्सियस 

वाढलेल्या उन्हाचा परिणाम सामान्य जनजीवनावर होत असल्याचं दिसून येत आहे. दुपारी काही महत्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिक घरांमध्येच राहणे पसंत करीत असल्याने रस्ते ओस पडल्याच चित्र आहे. उन्हापासून बचावासाठी नागपूरच्या अशोक चौकात खासगी कंपनीतर्फे सिग्नल वर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी ग्रीन शेड टाकून मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे. तर उन्हाची दाहकता कमी व्हावी म्हणून नागरिक शीतपेयाचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत.