गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.  

Updated: Jul 30, 2019, 07:45 PM IST
गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली - जितेंद्र आव्हाड title=

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करत गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक याना पाठिंबा दिला आहे. गणेश नाईक यांनी नगरसेवकांशी आणि कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. दरम्यान गणेश नाईकांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट लावली, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आमदार संदीप नाईक यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे तेही उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी खासदार संजीव नाईकही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या या राष्ट्रवादी नेत्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.  

गणेश नाईक २०१४ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार होते. जेव्हा शरद पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हाच गणेश नाईक हे गुप्त बैठका घेण्यात गुंतले होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सूचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.