वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

Latur News : लातूरमध्ये एका विद्यार्थ्यावर दुःखद प्रसंग उभा राहिल्यानंतर त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षा विभागाने देखील गावातच या विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची सोय केली होती.

आकाश नेटके | Updated: Mar 4, 2024, 01:27 PM IST
वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय title=

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक विभागाची म्हणजेच दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली आहे. शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येत आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. अशातच लातूरमधल्या एका विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या मुलाच्या जन्मदात्या पित्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवास अग्निसंस्कार होऊन दुःखाचा डोंगर बाजूला सारून आणि त्यांच्या विरहाचे दुःख मनात ठेवत केवळ पित्याचे स्वप्न उराशी बाळगून या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा दिली.

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दरम्यान परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात असल्याने बोर्ड, शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर ऋषिकेशच्या परीक्षेची सोय केली होती.

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी-सलगरा बु. येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत असून राजीव गांधी विद्यालयात शिकतो. दहावी परीक्षेसाठी बोरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात त्याचा बैठक क्रमांक आला होता. मात्र परीक्षेच्या आधी संध्याकाळी त्याचे वडील रामनाथ पुरी यांचे काम करताना अपघाती निधन झाले. ही वार्ता समजताच ऋषिकेशला मामासह ढाळेगावला जावे लागले. सकाळी 10 : 30 वाजता ऋषिकेशच्या वडिलांचा अंत्यविधी होणार होता.

मात्र ऋषिकेशचे परीक्षा केंद्र त्याच्या मूळ गावापासून 100 किलोमीटरवर असल्याने त्याला दहावीचा पहिलाच पेपर देता येणार नाही असाच समज झाला होता. त्यात वडिलांच्या निधनामुळेही ऋषिकेशही पेपर देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता. मात्र, नातेवाइकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करत त्याला पेपर लिहिण्यास प्रोत्साहन दिलं.

ऋषिकेशसाठी सर्व प्रकारची अधिकाऱ्यांनी परवानगी मिळवून देत गावातीलच परीक्षा केंद्रावर त्याची परीक्षा देण्याची सोय केली. ऋषिकेशच्या कुटुंबात आई, छोटा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ऋषिकेश परीक्षा देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मात्र, लातूर विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली, सांत्वन केले. परीक्षा देण्यास त्याला तयार केले. सर्व प्रकारची परवानगी देत ढाळेगावातील माध्यमिक आश्रमशाळा या केंद्रावर त्याच्या परीक्षेची सोय केली. परीक्षेला जाताना ऋषिकेशने वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि तो परीक्षेला निघाला. हा सगळा प्रसंग पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.