पावसाअभावी शेतकऱ्याने निवडला दुसरा पर्याय, दीड एकरात घेतलं लाखोंचे उत्पन्न

Maharashtra Farming News: हवामान बदलामुळं कधी अवकाळी पाऊस तर कधी नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, यावर तोडगा काढत एका शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न घेतले आहे. 

Updated: Feb 20, 2024, 02:45 PM IST
पावसाअभावी शेतकऱ्याने निवडला दुसरा पर्याय, दीड एकरात घेतलं लाखोंचे उत्पन्न title=
Maharashtra farmers success with natural farming of Guva in bhandara

प्रवीण तांडेकर, झी मीडिया

Maharashtra Farming News: कधी अवकाळी पाऊस तर कधी पावलाची पाठ अशा दुहेरी संकटांनी शेतकरी सध्या त्रस्त आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरवला आहे. तर, राज्याच्या काही भागांत पावसाने पाठ फिरवल्यामुळं पिके करपून गेली आहेत. हवमान बदलाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दीड एकर शेतीतून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. 

पावसाअभावी व अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याने धान पिकाकडे पाठ फिरवली अन् शेतीत वेगळा प्रयोग राबवला आहे. शेतकऱ्याने शेतात पेरूची लागवड केली आहे. दीड एकर शेतात पेरुची लागवड करत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत त्याने बागायती शेतीचा पर्याय निवडला आहे. 

पारंपरिक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या देव्हाडी येथील अरुण मुटकुरे यांनी दीड एकर शेतीत पेरूची लागवड करीत मालामाल झाले आहेत. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी तर कधी वरुणराजाच्या अवकृपेमुळं दुष्काळाच्या छायेत त्यांना पारंपारीक धानाची शेती करावी लागत होती. मात्र त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा. मात्र या परिस्थितीतही खचून न जाता व टोकाचे पाऊल न उचलता वेगळे पर्याय चाचपडून पाहिले.

अरुण मुटकुरे यांनी कृषी विभागाचा सल्ला व इतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत धान शेतीऐवजी बागायती शेतीचा पर्याय निवडला आहे. 2019पासून ते बागायती शेतीकडे वळले आहे. त्यांच्याकडे असलेल्या तीन   एकर शेतीतून फक्त दीड एकर शेतात व्ही.एन.आर वाणाच्या जवळपास सातशे पेरूच्या झाडांची लागवड केली आहे. या शेतीतून त्यांनी एका वर्षात तब्बल दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यातून पाच लाख रुपये खर्च आला तर पाच लाख रुपये नगदी नफा या शेतकऱ्याला झाला आहे.  

पेरू या फळाने अरुण यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत खचून न जाता शेतीचे वागळे पर्याय चाचपडून पाहायला हवेत. पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेती व बागायती शेती असे नवे पर्याय या काळात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी परदेशातील पिक घेउनही शेतातून भरघोष उत्पन्न घेत आहेत. असे शेतकरी समाजापुढे नवा आदर्श निर्माण करत आहेत. अवकाळी आणि नापिकीचे संकट असताना या शेतकऱ्यांची गोष्ट इतरांसाठी प्रेरणादायक ठरु शकते.