'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 14, 2024, 08:22 AM IST
'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर title=

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचे. म्हणजेच लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? 

"पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुक्ताफळे उधळली. घराणेशाहीबद्दल ते बोलले. हा थेट सर्वसामान्य लोकांचा, तुमचा आमचा अपमान आहे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण हे मात्र घरगडी समजतात. तुच्छ, नोकर समजतात. म्हणून त्यांची ही गत झाली आहे. सर्व सोडून गेले आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार मोडले. बाळासाहेब असते तर आता जोड्याने मारले असते. शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? आमच्यासारख्या फाटक्या लोकांनी रक्ताचे पाणी केले. शिवसेना वाढवली. आयत्या बिळावर नागोबा होण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. बाळासाहेब म्हणायचे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे म्हणतात, मी आहे म्हणून तुम्ही आहात. हे तुम्हाला मान्य आहे का?" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही. कोणाचीही मूर्ती लावतील. नाव अटल सेतू पण अटलजींची फोटोच नाही. त्यामुळे कृपा करा की त्या मंदिरात स्वःताची नव्हे तर प्रभू श्रीरामाची मूर्ती लावा. प्रभूरामचंद्र दशरथ राजाचे पूत्र होते. त्यावेळी सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याबद्दल पंतप्रधान बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

शरद पवारांचीही टीका

"पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होती. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असं शरद पवार म्हणाले.