Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार

Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 14, 2023, 07:52 AM IST
Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार  title=
Maharashtra weather state to vitness temprature drop down latest updates

Weather Update : राज्यात हवामानानं पुन्हा एक नवं रुप घेतलं असून अरबी समुद्र आणि लगतच्या परिसरामध्ये होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम देशभरात दिसून येत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुार सध्याच्या घडीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेलं ढगाळ वातावरण आता कमी होताना दिसणार आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान कोरडं राहणार आहे. थोडक्यात आता पावसाळा हद्दपार होणार असून, उकाडाही कमी होणार आहे. कारण, गुलाबी थंडी आता राज्यावर पकड धरताना दिसत आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यावर पावसाचं सावट होतं. बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणही पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हे सावट दूर होणार असून, किमान तापमानातही मोठी घट होणार आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिवाळा जाणवू लागणार असल्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 

सध्याच्या घडीला औरंगाबादमध्ये राज्यातील किमान तापमानाची नोंद करण्यात आली. हा आकडा 14.8 अंश इतका होता. तिथं उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडीमुळं वातावरणात काही बदल होणार आहेत. 

देशाच्या दक्षिणेकडे पाऊसच... 

पुढील 24 तासांमध्ये अंदमान आणि निकोबरा बेट समूहामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. 

हेसुद्धा वाचा : आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल 

तिथं देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्वतशिखरांवर हिमवृष्टी होऊ शकते. या हिमवृष्टीमुळं मैदानी भागांमध्ये तापमान मोठ्या फरकानं कमी होऊ शकतं. काही ठिकाण बर्फवृष्टीचं प्रमाण जास्त असल्यानं त्या भागांमध्ये दैनंदिन दळणवळणाच्या सुविधांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. पर्यटकांसाठी मात्र हा ऋतू आणि त्यामध्ये होणारे बदल फारच आनंददायी असतील. त्यामुळं तुम्हीही उत्तरेकडील या राज्यांना भेट देण्याच्या विचारात असाल तर हा उत्तम वेळ आहे हे निश्चित.