'डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं' मनोज जरांगेंचा इशारा

Reservation : धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडू नका अस आवाहन जरांगे यांनी धनगर समाजाला केलंआहे. तसंच उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 24, 2023, 05:00 PM IST
'डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं' मनोज जरांगेंचा इशारा title=

Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला  यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि माजी आमदार अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजा (Maratha) संपूर्ण ताकदीने धनगर समाजाच्या पाठिशी उभं असल्याचं सांगितलं. धनगर समाजाला घटनेत आरक्षण आहे, मग तुम्हाला आरक्षण मिळालं कसं नाही हे कळायला मार्ग असल्याचं सांगत मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला.

सर्वसामान्य धनगर बांधवांनी मनात आणलं तर आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच, इथं बसलेले सर्व धनगर प्रत्येक घरात गेले तर लाखो धनगर उभे राहतील आणि आरक्षण मिळेल असं जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी आम्हाला 40 दिवस दिले आणि धनगर समाजाला 50 दिवस दिले, यात काहीतरी गोंधळ आहे, पण मी छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. आज आम्ही दिलेल्या डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे, संध्यााकाळपर्यंत आशा आहे, पण आज दिवसभरात काहीच झालं नाही तर उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय.

आरक्षण द्यायचं नसेल तर गावात येऊ नका, पुढच्या 50 दिवसात सरकराचं डोकं ठिकाणावर येईल, असंही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरुन आता धनगर समाजही आक्रमक झालाय.. धनगर समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात म्हणजे एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आलीय. आरक्षणासाठी धनगर समाजाने याआधी आमरण उपोषणही केलं होतं. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे.

आज डेडलाईन संपणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. 

गावबंदीचा नेत्यांना फटका
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते.  यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. 

काँगेस नेते अशोक चव्हाण यांनाही मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. अर्धापूर तालुक्यातल्या येळेगावात भाऊराव चव्हाण साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अशोक चव्हाणांकडून करण्यात आला. भाषण सुरू होताच त्यांना काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी घोषणा देणाऱ्या तरुणांनी केली. पोलीसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेत कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले. 

शरद पवारांचा ताफा अडवला
पुण्यात मराठा समाजाने शरद पवारांचा ताफा अडवण्यात आला. अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गो बॅक अशा आशयाचे पोस्टर दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आदोलकांना बाजुला काढण्यात यश मिळवलं. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. राज्याच्या गावागावात मराठा समाजाने नेत्यांना बंदी घातलीय.काल शरद पवारांनी सोलापूर दौराही रद्द केला होत. मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा समाजाने केला होता. तर अजित पवारांनाही मराठा समाजाने काल काळे झेंडे दाखवले होते.