Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा

Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 25, 2024, 08:44 PM IST
Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा title=

Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असून उद्या म्हणजेच 26 जुलैलाही असाच पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसामुळे एकीकडे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यासह रायगड, रत्नागिरी, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांनाही पावसाने झोडपलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला असून सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जिल्ह्यांना शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांनी सुट्टी जाहीर केली आहे ते जाणून घ्या. तसंच जर यामध्ये तुमचा जिल्हा यात नसेल तर तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या. याचं कारण महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

ठाणे - 

ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना, कॉलेजना रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे असं पालिकेने सांगितलं आहे. 

कल्याण डोंबिवली  -

कल्याण डोंबिवलीमधील सर्व शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीलाही मुसळधार पावसाचा फटका बसला असून शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. 

रायगड -

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत. रायगड जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे. 

रत्नागिरी -

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनाही उद्या सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी सदृश्य पाऊस आणि पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवर दोन दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आदेश दिला आहे.