Nagpur News : एका चुकीमुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न भंगलं.... रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Nagpur News : या दुर्दैवी अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणीला रेल्वेने 50 फूटांपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूही नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे

Updated: Jan 19, 2023, 10:03 AM IST
Nagpur News : एका चुकीमुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न भंगलं.... रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सध्या तरुणाईला मोबाईल फोन, विविध गॅजेट याचे अक्षरक्षः वेड लागल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल फोन (Mobile Phone) वापरता किंवा त्यावर बोलताना आपल्या आजूबाजूला काय घडतयं याचं भान अनेकांना राहत नाही. अशाच वागण्याने एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. हेडफोन (headphone) लावून मोबाईलवर बोलण्यात ही तरुणी भान विसरुन गेली आणि रेल्वेखाली आली. या भीषण अपघातात (Accident News) तरुणीचा जीव गेलाय. 

हेडफोन लावून मोबाईलवर बोलत रेल्वे रूळ ओलांडताना एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना नागपूर (Nagpur News) जिल्ह्यात घडली आहे. आरती मदन गुरव असे मृत तरुणीचे नाव असून ती डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. हिंगणा (hingna) तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ ही दुर्दैवी घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने आरतीचा मृत्यू झाला. आरती मूळची भंडारा जिल्ह्यातील सातोना गावची रहिवासी असून ती नागपूरच्या डोंगरगाव अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. आरती आपल्या नातेवाईकांकडे राहायला होती.

बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नागपूरमधील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करुन आरतीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे

कसा घडला अपघात?

बुधवारी सकाळी टाकळघाट येथून आरती एसटीने गुमगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी आरती थेट रेल्वे रुळावरुन चालत निघाली. आरती यावेळी कानात हेडफोन लावून चालली होती. तिला आजूबाजूला काय सुरुय याची कल्पना नव्हती. अशातच ती रेल्वे रुळ ओलांडू लागली. मात्र त्याचवेळी आरतीच्या दिशेने पुणे - नागपूर रेल्वे भरधाव वेगाने येत होती. आरतीचे त्याकडे लक्ष नव्हते मात्र तिला पाहणाऱ्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. मात्र आरती आपल्याच धुंदीत बोलत जात असल्याने त्यांचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर रेल्वेने आरतीला जोरदार धडक दिली आणि तिला 50 फूटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेत आरतीचा मृत्यू झाला.