आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल

आधी ईडीचं सरकार, आता येड्याचं सरकार आहे असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मातोश्रीवर महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

Updated: Aug 17, 2023, 11:42 PM IST
आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे; नाना पटोले यांचा हल्लाबोल  title=

Nana Patole : आधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पटोलेंनी ही टीका केली. भाजपची उलटीगिनती सुरू झालीय, असंही ते म्हणाले.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय स्नेहभोजन कार्यक्रमाला दांडी मारली. वांद्रे इथल्या ताज लँडस एन्ड हॉटेलमध्ये राजशिष्टाचार विभागाच्या वतीनं गुरुवारी डिनरचं आयोजन करण्यात आलं. मात्र मुंबईत असूनही अजित पवारांनी या सरकारी स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. त्यामुळं अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झालीय.. मात्र ते नाराज नसल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला.

फाईव्ह स्टारमध्ये धोंडा होतो हे अजबच आहे

मुख्यमंत्र्यांकडून आयोजित स्नेहभोजनावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका केली. फाईव्ह स्टारमध्ये धोंडा होतो हे अजबच आहे. ग्रामीण भागातील ही संस्कृती नाही. शिंदेंना आमदारांना जावयासारखी वागणूक द्यावी लागतेय. आमदारांचे लाड केले नाही तर काय होईल सगळ्यांना माहिती आहे असा टोला दानवेंनी लगावला आहे.

संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद हक्कभंग समितीनं राज्यसभेला पत्र लिहून केलीय. विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ म्हणून राऊतांनी केला होता, त्यावर एकमतानं राज्यसभेला ही शिफारस करण्यात आलीय.. त्यामुळे आता राज्यसभेकडून राऊतांवर काय कारवाई होते हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे..

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी  केली नारायण राणेंची मिमिक्री 

रत्नागिरीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी  पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मिमिक्री केली. राणेंच्या स्टाईलमध्ये फोन लावण्याची नक्कल जाधवांनी केली 2021 पुराच्या वेळी पाहणीसाठी आलेल्या राणेंनी जिल्हाधिका-यांना कसा फोन लावला, त्याची आठवण जाधवांनी करून दिली. शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.