'...नाहीतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची नोकरी जाणार'

'फडणवीस बोलतात ते फक्त दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठीच'

Updated: Jun 25, 2021, 09:09 AM IST
'...नाहीतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची नोकरी जाणार' title=

मुंबई: देशात एकीकडे कोरोनाने चिंता वाढवलेली असताना दुसरीकडे राजकीय नेते राजकारण करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर नाना पटोले यांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर देत टोला लगावला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळे दौऱ्यावर असताना भाजपावर जोरदार टीका केली. 

'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठी बोलवं लागतं. अन्यथा त्यांची नोकरी जाणार', असा टोला पटोलेंनी लगावला. वाझे प्रकरणात फडणवीस आपलं स्वताचं अनुभव सांगतात असाही पटोलेंनी टोला लगावला. इतकच नाही तर त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पटोले यांनी खरमरीत टीका केली. भाजप विरोधातील आघाडीचा आत्मा काँग्रेस आहे, असा दावाही पटोलेंनी केला. फडणवीस यांच्या गुप्त बैठकांबाबत आपल्याला माहिती नाही कारण आपल्याकडे ईडी अथवा सीबीआय नसल्याचा उपरोधिक टोला त्यांनी भाजपाला लावला. 

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर काय केली टीका?
कुठल्याही सरकारमध्ये एक मुख्यमंत्री असतो, इथे काही मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून काम करतात.सरकारमध्ये रोज नवे निर्णय होतात.  हे सरकार आहे की सर्कस आहे? ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं, असा घणाघात फडणवीसांनी सरकारवर केला आहे. सरकारमधील आमदारांच्या मुलानंच ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली. आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं पाप असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.