राज्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

कापूस, तूर, हरभरा पिकांवर पावसाचा परिणाम 

Updated: Jan 2, 2020, 10:12 AM IST
राज्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान title=
संग्रहित फोटो

यवतमाळ : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस भिजलाय, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक वाया गेलं जात आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हंगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस झाला

हिंगोली जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस पडतोय. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातही पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. 

नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. काटोल, नरखेड ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीटही झाल्याचीही माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 

गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला असून मोठं नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील गहू पिकाला पावसाचा फायदा असला तरी धुकं देखील पडत असल्याने गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 

हरभऱ्यावर घाटेअळी पडायला सुरवात झाली आहे. तर तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी आक्रमण चढवलंय. पावसामुळे गारठ्यात वाढ झाली असून भाजीपाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. ४ जानेवारीपर्यंत विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. 

वर्धा जिल्ह्यातही सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातात आलेले कापूस पीक मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाने ओलं झालं आहे. यात चणे, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसतानाच पुन्हा आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे.