'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'

Raj Thackeray On Ladka Shetkari: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाही आवाहन करताना आपल्या खास शैलीमध्ये शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 4, 2024, 12:31 PM IST
'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...' title=
सोशल मिडियावरुन व्यक्त केली भावना

Raj Thackeray On Ladka Shetkari: मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला केली आहे. शेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावं, असं राज यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना त्यांनी खास आपल्या शैलीत शाब्दिक टोलेबाजी केल्याचं दिसून येत आहे.

जितक्या लवकर...

राज यांनी ट्वीटर तसेच फेसबुकवरुन पोस्ट करत आपली मागणी मांडली आहे. "गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं," असं राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आजपर्यंत आपलं वाटोळं...

राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही यामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. "तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं," असं राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

नक्की वाचा >> '...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'

तसेच पुढे राज यांनी, "यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळं कोणी केलं तेही जनतेला समजेल," असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.

नक्की वाचा >> मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'

हात आखडता घेऊ नका...

"या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं," असं राज यांनी म्हटलं आहे.