'साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटी द्या'

 शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली 

Updated: Jan 21, 2020, 03:37 PM IST
'साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटी द्या' title=

बीड :  श्री साईबाबा जन्मस्थळावरुन सध्या शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद सुरु आहे. सर्वात आधी साईबाबा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या धुपखेडा गावात अवतरल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. या घटनेचा साईचरित्रातही उल्लेख आहे. त्यामुळे धुपखेड्याला विकास निधी का नाही ? असा सवाल गावकऱ्यांनी केला. या वादात आता बीडकर देखील उतरले आहेत. साईबाबा बीडमध्ये नोकरीस होते असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आता बीडकरांनी देखील १०० कोटी बीड ला द्यावे अशी मागणी केली आहे. बीड येथील भरत बुवा रामदासी यांनी राज्य सरकारला ही मागणी केली आहे. 

पाथरीला १०० कोटी देण्यास विरोध नाही पण पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान नाही, यावर पाथरीकर ठाम होते. काल शिर्डी-पाथरीकरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असल्याचे विधान मागे घेतले होते. 

साईबाबा हे बीड येथे नोकरीस होते याचे मौखिक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा  भरत बुवा रामदासी यांनी केला आहे.

तसेच साईचरित्रामध्ये देखील याचा उल्लेख असल्याचे ते म्हणतात. ते बीड येथे हातमागच्या दुकानात कामाला होते असे सांगितले जात असल्याचेही ते म्हणाले.