संभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sambhaji Bhide Statement: भिडेंची वक्तव्ये खपवून घेणार नाहीत. बेताल वक्तव्यांप्रकरणी पोलीस भिडेंवर योग्य कारवाई करतील, असे अजित पवार म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 1, 2023, 06:38 PM IST
संभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत- अजित पवार title=

Ajit Pawar On Sambhaji Bhide Statement: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्या टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सोहळ्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

भिडेंची वक्तव्य खपवून घेणार नाहीत. बेताल वक्तव्यांप्रकरणी पोलीस भिडेंवर योग्य कारवाई करतील, असे अजित पवार म्हणाले. 

भिडेंचा भाजपशी संबंध नाही 

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे लोकांमध्ये संताप तयार होतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दरम्यान यासंदर्भात उचीत कारवाई राज्य सरकार करेल, असेही ते यावेळी म्हणाले.  महात्मा गांधीबद्दल अपमानकारक वक्तव्य कुणीही करु नये. भिडेंच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले. तसेच भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

काय आहे वाद?

संभाजी भिडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमरावतीमध्ये बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम या सभागृहातील कार्यक्रमातील ही क्लिप असल्याचे बोलले जाते. या कार्यक्रमातील संभाजी भिडे महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह दावे केल्याचे ऐकायला मिळत आहे. 

मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला,असे या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 

तसेच त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचेही क्लिपमध्ये पुढे म्हटले आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. 

विधानसभेतदेखील या मुद्द्यावरुन खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात संभाजी भिडे यांच्यावर आगपाखड करत त्यांच्या अटकेची मागणी केली.