शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला

Riteish Deshmukh On Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकीय क्षेत्रामधून सिंधुदुर्गमधील घटनेवर प्रतिक्रिया येत असतानाच आता मनोरंजनसृष्टीमधूनही या प्रकरणी प्रतिक्रिया समोर येऊ लागल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 27, 2024, 07:38 AM IST
शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला title=
रितेशबरोबरच अमोल कोल्हेंनीही नोंदवलं मत

Riteish Deshmukh On Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाज महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी, 26 ऑगस्ट 2024 रोजी घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच म्हणजेच 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांबरोबरच देशाचे संरक्षण मंत्रीही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतात नौदलाची स्थापना करणारे पहिले व्यक्ती असल्याने नौदल दिनाच्यानिमित्ताने या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आल होतं. मात्र हा पुतळा कोसळल्याने त्याच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच नौदलानेही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सदर ठिकाणाची पहाणी आता नौदल अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यातच आता मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही या घटनेवर प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुखनेही या दुर्घटनेनंतर मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

अमोल कोल्हे यांनी कोसळलेल्या पुतळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना कोल्हे यांनी, "छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे "शक्तीस्थळ" असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे," अशी टीका कोणाचेही थेट नाव न घेता केली आहे.

नक्की वाचा >> '3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल

"सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी  शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे," असं अमोल कोल्हेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रितेशची तीन शब्दात प्रतिक्रिया

रितेश देशमुखने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन अवघ्या तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हात जोडणारा इमोजी वापरत रितेशने, 'राजे माफ करा' असं म्हटलं आहे. त्याने या पोस्टमध्ये #छत्रपति_शिवाजी_महाराज हा हॅशटॅग वापरला आहे.

नौदल नाराज

भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेननंतर एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनामधून नौदलाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार आणि संबंधित तज्ञांसह, नौदल घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास करणार आहे, असं नौदलाने म्हटलं आहे. लवकरात लवकर पुतळ्याची दुरूस्ती करुन, पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी पावले उचलण्यासाठी एक पथक नियुक्त केले जाणार असल्याचे नौदलाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे.