'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."

Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले असून, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे.राज ठाकरेंच्या या आऱोपांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून गेल्या 18 वर्षांपासून तेच रेकॉर्डिंग सुरु असल्याचा टोला लगावला आहे.   

Updated: Mar 23, 2023, 02:16 PM IST
'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."  title=

Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना (Shivsena) फुटली असा आरोप करताना नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला. मी उद्धव ठाकरेंना समोर बसवून वाद मिटवला होता असा दावा यावेळी त्यांनी केला. दरम्यान राज ठाकरेंच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं असून टोला लगावला आहे. ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"मी ते भाषण ऐकलेलं नाही. गेल्या 18 वर्षापासून ती रेकॉर्डिंग घासुन पुसून सुरु आहे. गेल्या वर्षी बीकेसीत मी एक मत मांडलं होतं. तेव्हा मी चित्रपटाचा दाखला दिला होता, तोच तुम्ही पुन्हा पाहू शकता," असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या आरोपांवर बोलताना केली. 

फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."

 

राज ठाकरेंनी माहिममध्ये समुद्रात दर्गा बांधल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने तिथे तोडक कारवाई केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की "हे बांधकाम काही नव्हतं. स्क्रिप्ट आल्याप्रमाणे तो बोलले असतील. अन्यथा एवढी वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होते. अशा अनेक गोष्टी राज्यात असली तर त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल". 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपण शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण सांगत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. "शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं, तुझं की माझं ह्यावर रस्सीखेच सुरु होती ते पाहताना मला त्रास होत होता. 'शिवसेना'मी लहानपणापासून जगलो. दुसरीत असल्यापासून  शर्टाच्या खिशावर शिवसेनेचा वाघ अभिमानाने मिरवायचो," अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली. 

"शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलो होतो की 'माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे'. मी शिवसेना सोडल्यानंतर बोललो होतो की हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नव्हतं. पक्ष स्थापनेच्या वेळेस, खरंतर मी शिवसेना का सोडली ह्यावर बोललो असतो. पण मी बोललो नाही. शिवसेना सोडताना ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. साफ झूट. शिवसेना हे शिवधनुष्य आहे ते फक्त बाळासाहेबांना पेलवलं. एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही कळेलच," असा टोला यावेळी त्यांनी लगावला. 

"शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे सांगतोय, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग. मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका.. उद्धव म्हणाले की मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव ना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धवना शिवसेनेत आम्ही नको होतो," असा दावा राज ठाकरेंनी केला. 

"नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती.  मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही," असाही आरोप राज ठाकरेंनी केला.