राज्यातील हवामानात मोठा बदल; पाहा कुठे नेमकी काय परिस्थिती

तापमानाचा पारा चांगलाच खाली 

Updated: Nov 12, 2021, 10:25 AM IST
राज्यातील हवामानात मोठा बदल; पाहा कुठे नेमकी काय परिस्थिती  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : पावसाचा मुक्काम लांबलेला असताना आता अखेर या वरुणराजानं बऱ्याच अंशी राज्यातून काढता पाय घेतलेला दिसत आहे. पण, तरीही काही भागांमध्ये पाऊस त्याच्या परतीच्या प्रवासातही आपले रंग दाखवताना दिसत आहेत. यामध्येच आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानाच मोठा ऋतूबदल झाल्याचं दिसून येत आहे. 

नाशिक, पुणे, सातारा या भागांमध्ये गुलाबी थंडीनं चाहूल दिली आहे. ज्यामुळं राज्याच हिवाळा आल्याचं स्पष्ट होत आहे. तिथे धुळ्यात तापमानाचा पारा दिवसागणिक घसरताना दिसत आहे. तापमानानं 9 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. हा आतापर्यंतचा तापमानाचा सर्वात कमी आकडा ठरत आहे. 

हवामानात झालेल्या या बदलाचा रब्बी पिकांना फायदा होणार असल्याची माहिती शेतकीय अभ्यासकांकडून देण्यात येत आहे. शिवाय उबदार कपडे विक्री करणाऱ्यांच्या व्यवसायालाही या हंगामानं फायदाच होणार आहे. 

पुण्यात बुधवारी तापमान थेट तीन ते चार अंशानी घसरलं असून, पारा 10.9 अंशांवर पोहोचला आहे. ज्यामुळं पुणंही गारठलं आहे. मुंबई, नवी मुंबईतही रात्रीपासून पहाटेच्या वेळादरम्यान तापमानाचा पारा चांगलाच खाली गेल्याचं आढळच आहे. 

राज्यातील तापमानाचा एकंदर आकडा पाहता, येत्या दिवसांमध्ये थंडीचा जोर कायम राहतो का य़ावरच हवामन खातं आणि साऱ्या राज्याचं लक्ष असेल.