शिवसेनेसोबतची युती तोडून भाजपला भविष्यात फायदा होणार?

महाराष्ट्रात कोणाला होणार राजकीय फायदा ?

Updated: Nov 11, 2019, 05:06 PM IST
शिवसेनेसोबतची युती तोडून भाजपला भविष्यात फायदा होणार? title=

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपची युती जवळपास तुटलीच आहे. २०१४ नंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची युती तुटली. २०१४ च्या निवडणुका स्वतंत्र लढण्यानंतर ही नंतर दोघे एकत्र आले होते. सध्या भाजपसाठी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा मार्ग बंद असला तरी भाजपला भविष्यात याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदाच्या वादाने दोन्ही पक्षामधील चर्चा थांबली. भाजपने सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी आता शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी सांगितलं आहे. शिवसेनेकडे बहुमत नसल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. पण एकमेकांचे इतके कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही पक्ष किती काळ सत्तेत एकत्र राहू शकतात असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे आहे.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर देशात भाजपची सत्ता नक्कीच वाढली आहे. २०१४ नंतर भाजपने अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वात मोठा राज्य आहे. ज्यावर भाजपची नजर होती. २०१४ पर्यंत शिवसेना राज्यात मोठा भाऊ होता. पण त्यानंतर भाजप मोठा भाऊ झाला.

२०१४ च्या निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा पक्ष होता. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. पण नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती.

महाराष्ट्रात शिवसेनेची हिंदुत्ववादी, मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानविरोधी अशी ओळख आहे. पण भाजपची ओळख ही याआधी हिंदूत्ववादी अशीच आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला. भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा चेहरा पुढे करुन निवडणुकांना सामोरे जात आहे.

शिवसेनेला मागे टाकून भाजप पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार झाला नसता. पण आता शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय़ घेतल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पाठिशी असणारे लोकं नक्कीच नाराज होतील. हे भाजपला ही चांगलं माहित आहे. त्यामुळे भाजपने ही युती तुटण्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाताना शिवसेनेला हिंदुत्वाचं राजकारण आणि मुस्लीम विरोधी भूमिका घेताना आता अवघड जाणं आहे. पण आता महाराष्ट्रात फक्त भाजप हाच हिंदुत्ववादी पक्ष ठरणार आहे. अयोध्येचा निर्णय ही आला आहे. त्याआधी अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे मोदी सरकारचं देशभरातून कौतुक झालं होतं. त्यामुळे या पुढे याच मुद्द्यांवर भाजप शिवसेनेला मागे टाकून राज्यातही पुढे निघून जाण्याचा विचार करत असेल.

महाराष्ट्रात आता पुढची निवडणूक भाजप विरुद्ध इतर सगळे पक्ष अशीच होणार आहे. भाजपला आशा आहे की आगामी काळात त्यांना यश मिळेल. पण शिवसेना सरकार स्थापन झाल्यानंतर कोण-कोणत्या मुद्द्यांना हात घालते हे पाहावं लागणार आहे.