अंबानीचं सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे - आशिष शेलार

मुकेश अंबानी यांचं मिलिंद देवरा यांचं समर्थन

Updated: Apr 19, 2019, 06:17 PM IST
अंबानीचं सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे - आशिष शेलार title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. सोशल मीडिया कॅम्पेनिंगकडे उमेदवारांचा अधिक कल पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी देखील एका प्रमोशन व्हिडिओच्या माध्यमांतून प्रचार केला. ज्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

आशिष शेलार यांनी म्हटलं की, 'कोणी कोणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा विषय आहे. आमच्याकडे फडणवीसांचं समर्थ नेतृत्व आहे. भाजपला कोणत्याही उद्योगपतीची गरज भासली नाही. पण आम्हाला अंबानीचं सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे असल्याचं आज लोकांना कळलं.' असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. काँग्रेसचे दक्षिण मुंबईतले उमेदवार मिलिंद देवरा यांना एका व्हिडिओतून मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावरुन आशिष शेलारांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

काँग्रेसकडून बाजू मांडताना, 'प्रत्येकाला राज्यघटनेनुसार कोणत्याही उमेदवाराला समर्थन द्यायचा अधिकार असल्याचं,' काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी म्हटलं आहे. सोबतच 'काँग्रेसचा अंबानींना विरोध नसून, राफेल गैरव्यवहाराला विरोध असल्याचं' देखील त्यांनी म्हटलं आहे.

>