'शिवसेना आता उभी राहाणार नाही, शिवसेनेच्या जीवावर उद्धव ठाकरेंनी खोके जमा केले'

नारायण राणे यांचा रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप

Updated: Jul 26, 2022, 06:34 PM IST
'शिवसेना आता उभी राहाणार नाही, शिवसेनेच्या जीवावर उद्धव ठाकरेंनी खोके जमा केले' title=

 

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काहीही येत नाही प्रत्येक वेळी म्हणायचं मर्द असाल तर... तुम्ही मर्द मर्द का म्हणतो, तूम्ही सिद्ध केलं का आधी, प्रत्येक काम दुसऱ्याच्या हाताने करुन घेतो हा माणूस. आम्हाला तुमच्या मर्दांगीबद्दल सर्व माहिती आहे, आम्हाला इतिहास माहिती आहे अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 

उद्धव ठाकरेंना सोडून 50 आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात का गेले, कारण यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी दिलं. यांनी कोणाला प्रेम दिलं नाही, यांनी कोणावर विश्वास ठेवला नाही. का राहतील तुमच्याबरोबर? आता काय राहिलं, एक डझन आमदार आणि पाव डझन खासदार. हाताशी काय आहे किती बडबड करतो अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. 

शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलंय़
मी 1966 चा शिवसैनिक आहे, 66च्या शिवसैनिकांनी शिवसेना म्हणून जे सोसलं, जीव तळहातावर घेऊन, हे सर्व काम करताना आम्हाला माहित नसायचं की आम्ही रात्री परत घरी जाऊ की नाही. प्राण पणाला लावून साथ दिली. साहेब आमचं प्रेम नव्हतं तर साहेब आमचं वेड होतं, असं सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी काय केलं असा सावल उपस्थित केला.

उद्धव ठाकरे आता म्हणतायत माझे वडिल, माझा वारसा. पण वारसा हा रक्ताने असतो का, विचाराने नसतो. साहेबांचे किती विचार आत्मसात केले. साहेबांना जेवढं प्रेम दिलं त्याच्या अधिक पटीने यांनी साहेबांना दु:ख दिलं आहे, त्रास दिला आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर मोठा शून्य म्हणजे उद्धव ठाकरे. बाळासाहेब, माँसाहेब हे आमचं दैवत आहे. त्यावेळेला आम्ही आमच्या आई-वडिलांचं ऐकलं नाही, पण साहेब जे बोलत होते ते करत गेलो. 

शिवसेना उभी राहत असताना उद्धव ठाकरे यांनी कधी कुणाला एक लाफा मारला नाही. दंगलीत शिवसैनिक मरत होता, त्या दंगलीला कधी सामोरा गेलास. दंगलीत सहभागी झालास काहीही केलं नाही या माणसाने. शिवसेनेच्या जीवावर तू अडीच वर्षात खोके जमा केलेस असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे सारख्या माणसाला छळलं, माझ्या सारख्या माणसाने सहन केलं नसतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास पण चालवतं कोण आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या चालवतात खातं, तरी त्यांनी सहन करायचं. खोके यांनी जमा करायचे आणि रिकामे पुठ्ठ्याचे खोके फेकायला यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यायचा. 

उद्धव ठाकरे हा खोटारडा माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उभी राहाणार नाही. हिंदुत्व सोडून राष्ट्रवादीत गेलात. फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचार झालेला माणूस. नावं जाहीर होण्याच्या आदल्या रात्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या घरी गेले होते. मीच मुख्यमंत्री होणार पवार साहेब माझं नाव जाहीर करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोटही नारायण राणे यांनी केला.

आता शाखेशाखेत जातायत, पण निष्ठावाण शिवसैनिक कुठून आणणार, एक हजार रुपये देऊन 2 तासांसाठी माणसं आणली जातात. फेरीवाल्यांना आणून बसवलं जातं. काय अवस्था आहे शिवसेनेची अशी टीका नारायण राणे यांनी केली.