मुंबईकरांसाठी आशेचा किरण, कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यू दरही कमी झाला

देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

Updated: Apr 29, 2020, 10:16 PM IST
मुंबईकरांसाठी आशेचा किरण, कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यू दरही कमी झाला title=

मुंबई : देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. १७ ते २७ एप्रिलदरम्यान रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ८.३ दिवसांवरून १० दिवसांवर गेला आहे. तर मुंबईतला मृत्यूदरही ६.३ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतला रुग्ण वाढीच्या दुपटीचा कालावधी देश आणि राज्याच्या तुलनेत कमी असल्याचा केंद्रीय समितीचा निष्कर्ष आहे.

देशामध्ये रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ९.५ दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्रात हा कालावधी ८.९ दिवस इतका आहे. केंद्रीय समितीने मुंबई महापालिकेच्या प्रतिबंधात्मक प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

राज्यामध्ये प्रत्येक १०० कोरोनाच्या रुग्णांपैकी ४.३ जणांचा मृत्यू होत आहे. मुंबईमध्ये हीच संख्या ३.९ एवढी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हाच मृत्यूदर ६.३ एवढा होता. 

मुंबईमध्ये ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. २६ एप्रिलपर्यंत तब्बल १ लाख २९ हजार ४७७ रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आलं. यातील २१ हजार ५३ हायरिस्क गटातील संपर्क होते, यातून १,६४७ रुग्ण शोधण्यात आले. 

मुंबईमध्ये आत्तापर्यंत ६६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी १० लाख व्यक्तींपैकी ५,०७१ जणांची मुंबईत कोरोनाचा चाचणी करण्यात आली. तामीळनाडूमध्ये हे प्रमाण २,६२४ राजस्थानमध्ये १,२२० नवी दिल्लीमध्ये ७९४ आणि केरळमध्ये ६८४ एवढं आहे. मुंबई महापालिकेने २०४ फिवर क्लिनिकमधून २३८ कोरोनाचे रुग्ण शोधले आहेत.