Corona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अरेरावी चालते, चंद्रकांत पाटील यांचा आरोप  

Updated: Jan 5, 2022, 06:29 PM IST
Corona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं title=

मुंबई : गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन  (Lockdown) लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पिंपरी चिंचवड इथं पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

 निर्बंधांना विरोध नाही पण लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी खूप नुकसान सहन केलं. हा मोठा कालावधी आहे. आता आणखी किती सहन करणार हा सवाल आहे. त्यामुळे राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत पण सर्व काही बंद करण्याची भूमिका असू नये. तसेच कोरोनाचे स्वरुप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील कोरोना आढावा बैठकांमध्ये आपण गेली दीड वर्षे उपस्थित राहिलो नसल्याबद्दल माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्या बैठकांमध्ये अरेरावी चालते. उपस्थितांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेतील अस्वस्थता हळुहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेसोबत भाजपाची युती होऊ शकते का, असे एका पत्रकाराने विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशा शक्यतेबाबत आपल्याला काही माहिती नाही. राजकारणात कधीही काही होऊ शकते, पण त्याबद्दल सांगता येत नाही. सामान्य माणसाची इच्छा आहे की, दोन भावांमध्ये भांडणे झाली तरी केव्हा तरी भांडणे संपवून पुन्हा जुने संबंध निर्माण करावे लागतात.

आपण युतीबद्दल काही बोलणार नाही. तसे बोलले की, लगेच शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्यावर सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही, अशी टीका होते. प्रत्यक्षात आपल्याला शांत झोप लागते, असा टोला त्यांनी हाणला.