'जनविरोधी सरकारला वठणीवर आणणार', 2 दिवसांच्या अधिवेशनावर फडणवीस भडकले

दोन दिवसांत जनतेचे प्रश्न कसे मांडणार, फडणवीसांचा सवाल 

Updated: Jun 22, 2021, 04:29 PM IST
'जनविरोधी सरकारला वठणीवर आणणार', 2 दिवसांच्या अधिवेशनावर फडणवीस भडकले title=

मुंबई : यंदाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) दोन दिवस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ 2 दिवसांचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस भडकले

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 2 दिवस घेण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाराजी व्यक्त केलीय. केवळ दोन दिवसांत जनतेचे प्रश्न कसे मांडणार असा सवाल फडणवीसांनी केलाय. 3 पक्षांच्या भानगडीत जनतेचा बळी का देताय असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी तिन्ही पक्ष सत्तेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच सरकारनं मंदिरांऐवजी मदिरालयाला महत्त्व दिल्याचंही ते यावेळी म्हणाले. दारू दुकानाचं नवीन लायसन्स न देण्याचा ४० वर्षांपूवी ठराव झालाय. मात्र आता नवीन दारूचे लायसन्स द्यायचा राज्य सरकार घाट घालतंय. याचा आम्ही विरोध करणार असल्याचंही ते म्हणाले. 

'राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांची गर्दी चालते'

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला झालेल्या गर्दीचा हवाला देत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन होऊ शकतं. पण, राज्याच्या विधिमंडळामध्ये करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही,” असा मु्द्दा उपस्थित करत फडणवीस ठाकरे सरकारवर चांगलेच भडकले.