'कोंबडी चोर' म्हणत नारायण राणेंविरोधात दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी

नारायण राणे - शिवसेना संघर्ष वाढणार 

Updated: Aug 24, 2021, 07:33 AM IST
'कोंबडी चोर' म्हणत नारायण राणेंविरोधात दादरमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी  title=

मुंबई :  महाड इथे पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत ज्यांना स्वातंत्र्यदिन कितवा आहे हे माहित नाही, अशा माणसांबद्दल काय बोलायचं? असं सांगत नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या विरोधात दादरमध्ये शिवसैनिकांनी 'कोंबडी चोर' चे पोस्टर लावत पोस्टरबाजी केली. 

नारायण राणे यांच्या विरोधात मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर काढले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरीही याचे फोटो व्हायरल झाले आहेत. (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव)

तसेच नारायण राणेंविरोधात नाशिकमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चिथावणीखोर विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांना बोलायचा अधिकार आहे का, बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवावा आणि मग माहिती घेऊन बोलावं अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

‘त्यांचं ऍडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.