प्रेम प्रकरणातून शालिमार एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

सर्व प्रकरणाचा अखेरीस छडा लागला.

Updated: Jun 7, 2019, 07:32 PM IST
प्रेम प्रकरणातून शालिमार एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी शालिमार एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर आली होती. या सर्व प्रकरणाचा अखेरीस छडा लागला आहे. शालिमार एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा ही प्रेम प्रकरणातून पसरवली होती. प्रेयसीने लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रेयसीच्या पतीविरोधात प्रियकरानी हा सर्व कट रचला होता.

अनंत वानखेडे आणि त्याची प्रेयसी या दोघांच प्रेमरप्रकरण होते. परंतु तिने दुसऱ्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनंतने संबंध ठेवण्यास प्रेयसीला सांगितले. मात्र प्रेयसीने त्याला नकार दिला. त्यामुळे प्रेयसीच्या पतीला अडकवण्यासाठी प्रियकराने हा सर्व कारनामा केला.
 
हा माथेफिरु तरुण विदर्भातल्या बुलडाणामधील आहे. अनंत वानखेडे असे या तरुणाचं नाव आहे. त्याला मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी बुल़डाण्यातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं.

नक्की काय घडले होते

पश्चिम बंगालमधल्या हावडा येथून ५ जूनला शालिमार एक्सप्रेस एलटीटी स्थानकात प्रवेश केला. गाडी रिकामी झाल्यावर सफाई कामगार गाडीत शिरले. जिलेटीनच्या कांड्यासारखी दिसणारी स्फोटकं गाडीमध्ये आढळल्याने सफाई कामगार घाबरले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी पोलीस, श्वान पथक, बॉम्ब निकामी पथक, शहर पोलीस, दहशतवादविरोधी पथक पोहोचलं. स्फोटकांसोबत भाजप सरकारला धमकी देणारं पत्र देखील होतं.