अजित पवार गटाला धक्का, छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

Maratha vs OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 23, 2023, 02:49 PM IST
अजित पवार गटाला धक्का, छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? title=

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे., त्यामुळे त्यांना भाजपची (BJP) ऑफर असेल असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायत. आमचे बॅनर फाडले जातायत. त्यामुळे अजित पवारांनी (Ajit Pawar) भुजबळांना रोखावं अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस असल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केलाय. बॅनर फाडणारे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाहीये, दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसींना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय.

फडणवीसांची ऑफर
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असणार कारण गृहमंत्री त्यांना थांबवत नाहीए, आणि काही बोलतही नाहीएत, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान काल नाशिकमध्ये (Nashik) बोलताना मनोज जरांगेंनी गौप्यस्फोट केला होता. भुजबळ कुठे भाजी विकत होते, कुणाच्या येथे काय करत होते, त्यांनी कुणाचा बंगला हडप केला हे सर्व मला ठावूक आहे, असं जरांगेंनी म्हटलंय.

संजय राऊत यांनी केलं समर्थन
मनोज जरांगेंच्या बोलण्यात तथ्य आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांचं समर्थन केलंय. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे आमदार-खासदार हे भाजपात जाणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. भाजपाने उमेदवारी दिल्यास कमळ चिन्हावर  निवडणुका लढतील, असा दावा राऊतांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दरम्यान राऊतांकडे दुसरं काम नसल्यानं ते शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करत असल्याचं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलंय.

महाराष्ट्र दौऱ्याचा शेवटचा दिवस
जरांगे पाटीलांच्या खोपोलीतील सभेनंतर मराठा समाजाच्या शिष्ट मंडळाने कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांची भेट घेतली. त्यांच्याशी कुणबी नोंदिंबाबत चर्चा केली...यावेळी मराठा बांधवांनी कागदपत्रे सादर करावीत असं आवाहन  तहसीलदारांनी केलंय. दरम्यान, मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. श्रीरामपूरमध्ये जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीतून जरांगेवर फुलांची उधळण करण्यात आली. आज जरांगे अहमदनगर, बीड दौऱ्यावर आहे. आजच्या दौऱ्यात त्यांचा एकूण पाच सभा होणार आहेत.