Maharashtra Unlock - राज्य सरकारचा 'ओपनिंग अप'चा मंत्र

पुढील आठवड्यांपासून राज्यात टप्प्याटप्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता

Updated: Jul 13, 2021, 08:18 PM IST
Maharashtra Unlock - राज्य सरकारचा 'ओपनिंग अप'चा मंत्र title=

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवून अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी राज्य सरकार 'ओपनिंग अप'चा मंत्र अवलंबणार असल्याची माहिती आहे. 

कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देता येतील यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर 9 जुलैला राज्य आपतकालिन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अहवाल मागवला होता. 

कसं असेल ओपनिंग अप?

टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याची योजना असून वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार आहे, यासाठी लसीकरण झालेल्यांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.

पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार असून 50 टक्क्याची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याची सूचना हॉटेलना दिल्या जातील.

दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असून दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेले आवश्यक आहे. आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होवून टप्याटप्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होऊ शकतो. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती आहे.