त्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार

एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेचे दोन आमदार परतले, मीडियासमोबर सांगितलं नेमकं काय घडलं

Updated: Jun 23, 2022, 02:57 PM IST
त्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार title=

Maharashta Political Crisis : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या काही समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 42 आमदार आपल्याबरोबर असल्याच दावा केला आहे. 

पण या आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. शिंदे गटातून निसटलेल्या आमदार कैलास पाटील (Kailas Patil) आणि आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना आज शिवसेनेने (Shivsena) मीडियासमोर आणलं. यावेळी आपल्याला फसवून सूरतला नेण्याच आल्याचा आरोप करत कंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सुटकेचा थरार मीडियाला सांगितला. 

त्या दिवशी नेमकं काय घडलं, कैलास पाटील यांनी सांगितला सुटकेचा थरार
विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावलं गेलं. आम्ही गेलो तिथे, त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं कि आपल्याला जायचं आहे, एकनाथ शिंदे तिथे आपल्याला भेटणार आहेत. तिथून आम्हाला ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेण्यात आलं. तिथे आम्हाला सांगितलं साहेब पुढे आहेत, तिथून आमची गाडी बदलण्यात आली. 

त्यावेळी त्यांच्या स्टाफमधला एक कर्मचारी आमच्यासोबत होता. महापौर बंगल्यातून गाड्या निघल्या, पण ठाणे, वसई, विरार गेलं, त्यानंतर माझ्या मनात थोडा संशय आला. शहर संपत गेली. ज्यावेळेस या गाड्या बॉर्डर चेकपोस्टवर आल्या त्यावेळेस मला समजलं काही तरी वेगळं घडतंय. 

चेकपोस्टवर नाकाबंदी होती. त्यांच्या स्टाफमधल्या एका माणसाने आम्हाला सांगितलं नाकाबंदी आहे तुम्ही थोडं चालत पुढे या, त्या संधीचा फायदा घेत मी खाली उतरलो. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जो रस्ता आहे त्या दिशेने चालत निघालो. ट्रॅफिकमधून वाट काढत मी चालत होतो, एका मोटरसायकलवाल्याला विनंती केली, त्याने मला एका गावापर्यंत सोडलं. त्यानंतर काही ट्रकवाल्यांना विनंती केली पण बऱ्याच जणांनी नकार दिला. 

या दरम्यान, मी आमच्या नेत्यांशी मोबाईलवरुन संपर्क साधला, पण माझ्या मोबाईलची बॅटरी लो होती, त्यानंतर एका युपी ट्रक वाल्याने माझी विनंती मान्य केली, त्याने मला दहिसर टोलनाक्यावर सोडलं. मी त्याच्याबरोबर सेल्फीही काढला. तोपर्यंत मला न्यायला गाडी आली होती. 

ज्या शिवसेनेने मला आमदार केलं त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही. मला जसं नेलं तसं इच्छा नसूनही काही आमदारांना तिथे नेण्यात आलं आहे.