लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर पडणार

Updated: Feb 11, 2021, 08:11 AM IST
लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर title=

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी जवळपास 10 महिने बंद असलेली लोकल 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या लोकलनं प्रवास करण्यासाठी प्रशासन आणि रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसारच लोकलनं प्रवास करणं बंधनकारक आहे. अन्यथा दंड आकारण्यात येत आहे. ज्या वेळा प्रशासनाकडून ठरवून दिल्या आहेत त्याचा मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना विशेष फायदा होत नाही. त्यामुळे लोकलच्या या वेळा बदलाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. 

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना सोयीस्कर होईल अशी वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. मात्र कोरोना रुग्णांची काही प्रमाणात वाढणारी संख्या लक्षात घेता वेळ बदलण्याबाबत मुख्यमंत्री अनुकूल नाहीत. 

सध्या सर्वसामान्यांसाठी लोकल पहाटे लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकल पर्यंत प्रवासासा मुभा आहे, तर दुसरीकडे लोकलच्या वेळेत शिथिलता मिळणार नसेल तर शनिवार रविवार तरी सामान्य प्रवाशांना प्रवास करायला मुभा द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.  

गेल्या 24 तासांत मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालीय . गेल्या 24 तासांत 558 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 4 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत एकूण कोरोनाबधितांची संख्या तीन लाख 13 हजार 206 इतकी आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.12 टक्क्यांवर स्थिर होता. मात्र हा बुधवारी त्यात किंचित वाढ होऊन तो 0.13 टक्के झाला.