ईडीकडून अटक झाल्यानंतर नवाब मलिक पदाचा राजीनामा देणार?

नवाब मलिक यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास मोठ्या आंदोलनाचा भाजपाचा इशारा

Updated: Feb 23, 2022, 03:58 PM IST
ईडीकडून अटक झाल्यानंतर नवाब मलिक पदाचा राजीनामा देणार? title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest)) यांना तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर  ईडीने (ED) अटक केली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात महत्वाची बैठक पार पडतेय. नवाब मलिक यांच्या अटकेनंतरचे हे पडसाद आहेत.

ईडीने अटकेच्या कारवाईसंदर्भात राज्यपालांनाही कल्पना दिलेली आहे. कारण नियमानुसार राज्यपालांनी नवाब मलिक यांना पदाची शपथ दिली होती. 

त्यामुळे नवाब मलिक यांना अटकेच्या कारवाईनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मलिक यांनी राजीनामा दिला तर तो स्विकारला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेनंतर मलिक पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पाठवला जातो. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडेही लक्ष लागलं आहे.

राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
दरम्यान नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घएतली आहे. नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा भाजप मोठं आंदोलन करेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.