देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली आहे.  

Updated: Nov 9, 2019, 08:01 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका title=

मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली आहे. बा विठ्ठला आता चूक होणार नाही, अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. विठ्ठला, नक्की काय चुकलं? 'काळजीवाहूं'ची काळजी, या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

'काळजीवाहू' सरकार  फक्त 'वर्षा'वर आहे. बांधून ठेवलेल्या सामानावर बसून त्यांना उलटसुलट कारवाया करता येणार नाहीत. पाच वर्षे या भयंकर स्थितीतून महाराष्ट्र गेला आहे. जनतेच्या मनाप्रमाणेच घडावे. बा विठ्ठला, आता चूक होणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी पांडुरंगासमोर लोटांगण घातलेच आहे. निदान त्यांना आता तरी सुबुद्धी घ्या, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

दुष्काळाने शेतकरी हवालदिल

काय चुकले, काय पाप केले ते सारा महाराष्ट्रच पाहतो आहे. पाप फार झाले म्हणून आधी 'कोरडा' आणि नंतर 'ओल्या' दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. काय चुकले ते आपल्या मनास विचारा इतकेच पांडुरंगाचे म्हणणे असावे. राज्यात आजही सत्तास्थापनेचा घोळ संपलेला नाही आणि त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचे खेळ सुरु आहेत.

मोठ्या पक्षांना डावलून भाजपची सत्ता

गेल्या सात वर्षांत अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्या प्रत्येकवेळी भाजपने तात्काळ सत्तास्थापनेचा दावा केला. गोवा आणि मणिपुरात तर सर्वात मोठ्या पक्षांना डावलून भाजपने राज्यपालांच्या सक्रिय सहकार्याने सत्तास्थापनेचा दावा केला हे उघड सत्य आहे. 

'भय दाखवले जात आहे, त्यात तथ्य नाही'

मात्र, महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असूनही ते सत्तास्थापनेचा दावा करीत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपुष्टात आली. या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भय दाखवले जात आहे. यात काहीही तथ्य नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन पर्यायी व्यवस्था होईलपर्यंत राज्यपालांनी त्यांनी 'काळजीवाहू' मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.