सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून राजकारण आणि ब्लेमगेम सुरु

पूल दुर्घटनेवरुन राजकारणाला सुरुवात

Updated: Mar 15, 2019, 02:18 PM IST
सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून राजकारण आणि ब्लेमगेम सुरु title=

मुंबई : सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाच्या दुर्घटनेवरून पुन्हा ब्लेमगेम सुरू झाला असून रेल्वेकडून दुरुस्तीची परवानगी मिळाली नसल्याचा महापौरांनी आरोप केलाय तर हा पूल महापालिकेचा असल्याचा दावा रेल्वेनं केला आहे. पालिकेनं रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीनं हलवलेत. तसंच पुलाचा धोकादायक स्लॅब देखील पाडण्यात आला. अजूनही याठिकाणची वाहतूक बंद आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरचा पादचारी पूल कोसळल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं संतापजनक राजकारण सुरू झालंय. मनपा आणि रेल्वे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मश्गूल आहेत. तर विरोधीपक्ष नेते रवी राजा यातून मनपावर दोषारोप करत आहेत. 

ऑडीटकरून देखील मुंबईत पूल पडत असेल तर सत्तेतील लोकांची हकालपट्टी करा. या घटनेला महापालिका आयुक्तही जबाबदार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेकडे पैसा असूनही वारंवार मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.