जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते.

Updated: Sep 9, 2019, 02:11 PM IST
जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. एवढा कमी वेळ शिल्लक असताना भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून संदिग्धता आहे. त्यातच आता युतीच्या घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपा-शिवसेना युतीमध्ये घटक पक्षांना १८ जागा सोडण्यात येणार आहेत. यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्रामचा समावेश आहे. या ४ घटक पक्षांना सोडलेल्या १८ जागांपैकी १२ जागा आपल्या पक्षाला मिळणार असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

जानकरांचा दावा खरा मानला तर उरलेल्या ६ जागा इतर ३ पक्षांसाठी उरतात. त्यामुळे जानकारांच्या या दाव्यावरून घटक पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाणकारांच्या या दाव्याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत यांनी बोलण्यास नकार दिला आहे. रामदास आठवले यांनी याआधीच त्यांच्या पक्षाला १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

युतीचा फॉर्म्युला काय?

भाजपचे सध्या १२२ आमदार तर शिवसेनेचे ६३ आमदार आणि मित्रपक्षांच्या १८ जागा याची बेरीज केली तर ती होते २०३, एकूण २८८ जागांमधून २०३ वजा केले तर उरतात ८५ जागा. या ८५ जागांचे निम्मे केले तर ४२.५ म्हणजेच साधारण ४३ जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला १२२ आणि ४३ म्हणजेच १६५ आणि शिवसेनेच्या ६३ आणि ४३ अशा १०६ जागा होतात. पण शिवसेनेने ११० पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिला आहे.   

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरतील. त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.

भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता. तर महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.